Saturday 29 October 2011

बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा


Teen darwaza panhala.jpg
तीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळा
नावपन्हाळा
उंची४०४० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाण कोल्हापूर महाराष्ट्र
जवळचे गावकोल्हापूर
डोंगररांगकोल्हापूर
सध्याची अवस्थाव्यवस्थित



पन्हाळगड
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

इतिहास

पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८ ऑक्टोबर १६५९ ला घेतला. त्यानंतर एकदा हा किल्ला विजापूरकरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला. २ मार्च १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.


कसे जाल ?


नकाशा
चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

  • राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.
  • सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.
  • राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
  • अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेर्‍या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.
  • चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
  • सोमाळे तलाव - गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
  • रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
  • रेडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
  • संभाजी मंदिर- त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
  • धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
  • अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
  • महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
  • तीन दरवाजा- हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
  • बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

Tuesday 25 October 2011

शुभ दिपावली

दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-




1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.
2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.
5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.
6. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.
7. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.
8. इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.
9. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.
10. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.
11. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.
12. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.
13. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती. 
14. महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 

Saturday 22 October 2011

शिवप्रताप राजांचा प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोप-या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी भयाण खिंडी बसल्या पसरुनि आ रानमोळी
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे.




मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आह इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

इतिहास :

१६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.




प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
कसे जाल?  


महाड,पोलादपूरकडून किव्वा वाई ,महाबळेश्वरकडून आलं कि ,कुंभरेशी किंवा वाद नावाचे छोटुकल गाव लागतं .गडाच्या आग्नेयेस पारं नावच खेडं आहे .दोन्ही गावांमधून प्रतापगडावर जाता येतं

Friday 21 October 2011

स्‍वराज्‍याची राजधानीः रायगड मायभूमी

नावरायगड (किल्ला)
उंची८२० मीटर/२७०० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणरायगड
जवळचे गावरायगड
डोंगररांगसह्याद्री
सध्याची अवस्थाव्यवस्थित


इतिहास
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’.
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.
शिवराज्याभिषेक:शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्र प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले.१५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

१.पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायर्‍यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२.खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३.नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो अशी गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४.मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌ दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्‍यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५.महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्‍या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्‍यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६.चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्‍या आहेत.
७.हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्‍या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
८.गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९.स्तंभ :गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०.पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायर्‍या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
११.मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
१२.राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१४.राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
१५.नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायर्‍या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
१६.बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
१७.शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
१८.जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणेः-श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
१९.महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
२०.कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
२१.वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
२२.टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी
२३.हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्‍या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणार्‍या थंड वार्‍याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणार्‍याला जाणवते.
शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायर्‍या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.
स्‍वराज्‍याची राजधानीः रायगड मायभूमी

गडावरील पाण्याची सोय

पाण्याचे अनेक तलाव गडावर आहेत. पाणी मुबलक.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. १. पायवाट २. पाळणा

जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्यापासून चालत गेलात तर अंदाजे १ तास पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे

Thursday 20 October 2011

पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ

पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ

आल्याम्तीर कोल्याम्तीर फुं ssss
राज राजेश्वरा,,,,,दूरदेशीच्या पाखरा
परमेश्वरा सांग ssss ,,,,,,
देवा धर्माचे ,जपातापाचे ,                                               

भाऊसाहेब न नेईल तर 

फौज डुबल का जगल,,,,,,,,,,?
फौज डुबल अस तुला वाटत आसल तर ,,,,,,,,,,,,,?
आल्याम्तीर कोल्याम्तीर घु  ssss  
मुखातल पान खाली टाक.
आन डुबणार नसल तर शेपटीवर नाच
आल्याम्तीर कोल्याम्तीर घुईन घुई ssss
आणि पिंजर्यातून पोपटराव बाहेर आले  आजूबाजूच्या
गर्दीकडे पाहत तोंडातल पान खाली टाकल आणि,,,,,,,,,,,,,,,,
एकच हलकल्लोळ उडाला फौज बुडणार फौज बुडणार ssss ,,,,,,,,,,,,,,,
आणि असत्य सत्यात उतरल ,,,,,,केवळ बाजार बुनग्यांमुळे,,,,,,,
अंगावर काटा उभा राहतो हा प्रसंग वाचताना
विश्वास पाटलांच्या कादंबरीतील हा प्रसंग पानिपाताविषयी बरच काही सांगून जातो.
बाजार बुणगे आम्ही त्याही वेळी पोसत होतो आजही,
ह्याच आमच्या स्वभावामुळे आमच्या महाराष्ट्र धर्माच आम्ही ईतक नुकसान करून ठेवलाय ,
कि परप्रांतीयांनीहि ते तितक केल नसेल,,,,
कारण आम्ही सारे भीष्म वंशी,,,,,,,,,,.
त्या सार्या भीष्म वंशीयांच्या चरणी हे माझ पानिपत .
जस मी वाचल, जस मी पाहिलं ,जस मी अनुभवलं तस,,,,,,
हा ईथे तुम्हाला सनावळ नाही भेटणार कारण याच सनावळी च्या नादात आम्ही
नेमका ईतिहास विसरतो  आणि
नापास होतो .
पानिपतावर मी लिहाव ईतका मी मोठा नाही
बरेच जणांनी त्यावर लिहिल आहे .
मराठ्यांच्या चुका दाखवून दिल्यात तसेच त्यांच्या पराक्रमाचे पोवाडेहि हे गायले आहेत .
खरतर हि नियतीचीच ईच्छा होती 

मराठ्यांनी ईतिहासा कडून काही शिकावं .
म्हणून तर पानिपत नेमक कुरुक्क्षेत्रा जवळ  झाल,,,,,
महाभारत,
महाभारत आमच्या मराठ्यांनी वाचालच नसेल अस कस होईल,,,,,,,,?
या कुरुक्क्षेत्रात नेमका भगवान श्री कृष्ण पांडवांच्या बाजूने होता
आणि येथे मराठ्यांच्या बाजूने ,,,,,,,,,,,,,?
ईकडे यमुनेला पाय लावून वसुदेवाला दाखवणारा रस्ता मुरारी नव्हता
या रणांगणात गीता सांगणारा योगेश्वर नव्हता
आणि मराठ्यांकडे ती गीता ऐकून घेणारा अर्जुनही नव्हता
आमच्याकडे होती फक्त शब्दाला जागायची ताकद आणि  निष्ठा .
आणि कुरुक्क्षेत्र आम्हाला ओरडून सांगत होत
रथाच चाक अडकलेल्या कर्णालाही सोडू नकोस ,,,
आणि आम्ही
तरीही  त्या हरामखोर नजीब्याला धर्मपुत्र बनवून बसलो होतो.
हिंदू जेव्हा जेव्हा वरचढ ठरला तेव्हा तेव्हा मुसलमानांनी कांगावा केला
ईस्लाम खतरेमे ,,,,,,,,आणि नजीब्याने नेमक हेच केल
अहमदशा अब्दालीला बोलवलं धर्म वाचण्यासाठी ,,,
पण खरतर राष्ट्रनिर्मिती साठी संपत्तीची गरज असते आणि ती गरज
हिंदुस्थान नक्कीच पूर्ण करेल हा तैमूरलंग पासून बाबरा पर्यंतचा
ईतिहास
अब्दालीला ओरडून सांगत होता या दोघांनीही
हिंदुस्थानाला नागव करण्यातच धन्यता मानली होती.
अब्दाली खरतर याच साठी आला होता.

परंतु याच न्यायाने छत्रपतींनी ज्या कुणा
परप्रांतीयांना लुटलं तर आम्ही त्यांना चोर लुटारू ठरवलं ते शिकवत पानिपत,,,,
आमची भाऊबंदकी तेव्हाही होती आणि आज हि आहेच,
राघोभरारी वृत्ती तेव्हाही होत आजही  आहेच,
आम्ही तेव्हाही दुसर्याच्या घरातील दिवा लावण्यासाठी स्वतःच घर जाळत होतो आजही .
आणि आम्ही गेलो दक्षिणेतून उत्तरेकडे देश वाचवण्यासाठी
अहमदिया करारानुसार देश रक्षणासाठी
मराठ्यांच्या या उदात्त कल्पनेला उत्तरेत योग्य साथ मिली असती तर,,,,,,?
पण आम्ही तेव्हाही प्रगत नव्हत आजही,,,,
कारण रामायण तुम्हाला कस जागाव ते शिकवत
महाभारत कस जगू नये ते शिकवत आणि,,,,,,,,
पानिपत,,,
पानिपत तुम्हाला कस लढाव आणि कस लढू नये ते शिकवत .
दिलेला शब्द कधी कुठे कसा आणि का पाळावा ते शिकवत पानिपत ,,,
एक छत्रपती सोडले तर युध्द शास्त्राची जाण कुणालाच नव्हती ते शिकवत पानिपत,,,,
कोंडीत सापडलेल्या वाघाने कोंडी फोडण्यासाठी चवताळून शिकार्यावर हल्ला करावा आणि,,
सार्या तयारीनिशी टपून बसलेल्या शिकार्याने त्या वाघाचीच शिकार कशी करावी ते शिकवत पानिपत,,,
रणांगनाची माती बदलली कि लढाईच तंत्र  नियम बदलतात ते शिकवत पानिपत,,,,
दुष्मनाला माफ करा पण त्याला विसरू नका ते शिकवत पानिपत ,,,,
आणि आम्ही
"शरण आलेल्याला मरण चिंतु नये या धर्माचे सारे भीष्म वंशी ,,,,
बडी मां अयोध्येचा राजा सुजा  याच्या आईचे बोल नेमके
आहेत ती म्हणते सुजा अरे एकवेळ सैतानावर विश्वास ठेव पण ,,,,,,
त्या नाजीब्यावर नको ....आणि आम्ही.........?
खूप पूर्वी पासून आपल्याकडे ऐकायला मिळत होत
विश्वास गेला पानिपतावर ,पण नाही
काल १४ जानेवारीला त्या पावन भूमीवर जायचं भाग्य लाभल
आणि त्या निमित्ताने काही वाचायलाही मिळाल लक्षात आल कि
विश्वास आम्ही गमावला नाही कमावला ,,,,,,,,
याच पानिपतावर सार सार दैवासकट सार आमच्या विरोधात असताना
आम्ही ज्या प्राणपणाने लढलो त्याला ईतिहासात तोड नाही .,,कारण विश्वास.
आमचे पूर्वज एका भीम पराक्रमाचे दावेदार साक्षीदार मरहट्टे ज्यांनी
अटकेपार झेंडे रोवले यवनांना पाळता भुई थोडी केली .
ईतकी त्यानंतर म्लेन्छांनी परत वाकड्या नजरेने हिंदुस्थान कडे पाहिलं नाही.,,कारण विश्वास.
कारण त्यांना माहित होत,"अरे बचेंगे तो और भी लडेंगे  " अस गरजणारा
सिंहाच्या हि जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात चा मरहट्टा
दत्ताजी शिंदे कदाचित तिथे उभा असेल,,,,,,कारण विश्वास.
ह्याच विश्वासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांची गोष्ट येथे मला सांगावीशी वाटते .
दुसर्या महायुद्धाची ,,
जपानने त्या युद्धात उडी घेतली एक आघाडी त्यांनी फिलिपिन ऑस्ट्रेलिया विरुध्द
उघडली आणि ईतर आघाड्यांवर भरभर प्रांत जिंकणाऱ्या जपान्यांच्या पराक्रमाला ईथे मात्र खीळ बसली ,
फिलिपिनी जनतेने त्यांना चांगलेच रोखून धरले .
एक पाऊलही त्यांना पुढे टाकता येत नव्हते,
आपल्या संपूर्ण ताकदीनिशी जपानी धडकत होते
अखेरीस जपानची बरीचशी आक्रमक शक्ती वाया घालवल्यावर मग
फिलिपिनीहि आपले असंख्य सैनिक गमावल्यावर जपानला ,
९ एप्रील १९४१ रोजी शरण आले पण तो पर्यंत जपानी आक्रमकांचे
ईतके नुकसान झाले होते कि एक पाऊलही त्यांना पुढे तक्ता येत नव्हते .
आपल्या देशवासीयांच्या या असीम पराक्रमाचे प्रतिक म्हणून
फिलिपिनी जनता आजही
९ एप्रिल हा दिवस शरणागतीचा दिवस राष्ट्रीय शौर्याचा दिवस म्हणू
साजरा करतात .
आणि आपण अरे आपण तर लढलो पानिपतावर शेवट पर्यंत ,,,,,,,,,
प्रसंगी नदी किनारीची शाडूची माती खात झाडाझुडुपाचा पाला खात .
जगलो आणि लढलोही.
कारण आखिल
हिंदुस्थानचे रक्षणकर्ते कोण असतील तर ते आणि केवळ ते मराठे,,,,,,,हा होता विश्वास .
एक मात्र नक्की राज्यकर्ते त्याही वेळी निर्णय घेण्यास चुकले आजही .
गांधीबाबा सारखी राष्ट्रीय पिलावळ आजही पोसत आहेत ज्यांच्या मुळे या
देशाच्या स्वातंत्र्याच पानिपत झाल.
या रणभूमी वरच मराठयांच शौर्य ईतक होत कि स्वतः
अब्दाली म्हणतो ,
"मराठ्यांचे हे शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तम आणि ईस्क्न्दार
त्यांचे कृशानार्जुन हवे होते मराठ्यांचा हा भीम पराक्रम पाहून
त्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटे घातली असती .
मराठ्यांची हि युध्द लालसा आणि खुमखुमी ईतरान कडे दिसणे अशक्य .
आणि मराठ्यांना हे सार जमा कारण केवळ .....विश्वास.
दिल्ल्ही पासून काही तासांच्या अंतरावर पानिपत
काला आम जिथे हा पानिपतचा रणसंग्राम झाला
त्या रंगानातील ती पांढूर्की  माती कपाळी लावायचं  भाग्य मिळाल
या मातीत म्हणे ,
महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील वीर ईथे लढला आपल्या हिंदुस्थानसाठी,
त्याच्या रक्तामांसाचे येथल्या मातीत रुपांतर झाले आहे.
न जाणो माझ्या घरातील कुणी गेल असेल कुणी लढल असेल
नाहीतर ईथे फिरून परत येण्याचा योग तो काय कारण काय केवळ ,,,,विश्वास 

Wednesday 19 October 2011

अंधाराला घाबरण सोप्प असत अन दिवा लावण अवघड असत.....

अंधाराला घाबरण सोप्प असत अन दिवा लावण अवघड असत..... पण कुणी तर अवघड काम कारण जरुरीहि असत........समाजात ज्या काही चुका होतात घडतात त्या सज्जनांच्या निष्क्रीयतेमुळे दुर्जानांमुळे नाही तुम्हाला काय वाटत? आणि मला त्या निष्क्रिय सज्जनांच्या पंक्तीत बसायचे नाही त्या साठी हा छोटासा प्रयत्न आपणही तो कराल हि अपेक्षा,,,,,,,,,,,,,,

Tuesday 18 October 2011

|| जय भवानी जय शिवराय ||

                                                              || जय भवानी जय शिवराय ||
       कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या कृपा आशीर्वादाने आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी राजे यांच्या प्रेरणेने समाज कार्याचा वसा हाती घेण्याचा एक उपक्रम हाती घेत आहोत महाराष्ट्रातील तमाम मावळ सैनिक या कार्यात हर हर महादेवाचा हल कल्लोळ करत सहभागी होवून हे कार्य सिद्धीस न्हेण्यास मदत करेल हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
                                    
              |  शिवरायांचे आठवावे रूप   |
              | शिवरायांचा आठवाव प्रताप  |
              | शिवरायांचा आठवावा साक्षेप |
                            || भूमंडळी ||