Tuesday 15 January 2013

छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी राजांना म्हणतात .........

 

Picture 

  “त्या रुद्र-शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळानिळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळमाणसांच्यासाठी तुम्हा-आम्हासहीअसे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केल. तुम्हां-आम्हालाते प्रसंग पडला तर कैकवेळा करावे लागेल.

पंडित शिकवण देतात, ‘राजा हा विष्णूचा अंश आहे’. पण त्यांना ठाव नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच ‘शिवलिंग’ पुजतो.

शंभुराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे .....

रुद्रासारखेच वर्तावे .....”

संदर्भ - छावा (शिवाजी सावंत )   

Saturday 12 January 2013

समशेर बहाद्दर वीर प्रतापराव गुजर

समशेर बहाद्दर वीर प्रतापराव गुजर





प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो.शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती. प्रतापराव गुजर कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एक...ाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होत.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा .

बहिर्जी नाईक-

बहिर्जी नाईक-



बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या ...
कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार
गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वा‍र्‍याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आजकुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी
नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना
माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती
पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत. शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या
दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे
गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग
असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी
शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.ब‍र्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं
तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

सुरतेची पाळती

सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला. सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की, ''सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल, असे सांगितले त्याजवरून राजीयांनी विचार केला, आणि बेत निघाला. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालो खाल दिमाख होता सुरतेचा अशा ह्या सुरतेत औरंगजेबाच्या ...पाच हजार सैनिकांचा जागता पहारा. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे ३२५ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या सुरतेच्या प्रत्येक घराची खडान खडा माहिती राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक. सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर, इराणी, हाफ्शी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफघाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीही इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती. औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती, नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. ई.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. शत्रूला ही चिंता फार सतावित नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूलन्यास बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहित असलेली सुरतेची पहिली लुट. सुरत शहर (जे आजच्या गुजरात राज्यात येते) हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रीया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट साध्य केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लूटीतून संरक्षण दिले गेले सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली. आठ हजार घोडेस्वार तयार झाले. निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत ५ जानेवारी १६६४, मंगळवार शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायतखान बहादूर याने महाराजांचे सौजन्यशील फर्मान धुडकावून लाविले. त्या मगरूरी मुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली. सावकारांचे वाडे काबीज करून सोनं, रूपे, मोती, पोवळे, माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, असे नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या, इभ्राम्या, तराम्या, असफ्या, होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड, भांडे, तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले सूरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.

इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणा-या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या अग्रभागीच. कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही. पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने! दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस ही लुट चालू होती. पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...........

शूरवीर बहिर्जी नाईक समाधी

ठिकान : बानुरगढ़ (भूपाल गढ़)

तालुका : खानापूर

जिल्हा : सांगली

या स्फूर्ति स्थानानाआपण अवश्य भेट दिली पाहिजे।

Friday 11 January 2013

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती

बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती



बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे.पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.

दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-

"ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.

दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.

[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-

स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:

अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]

बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे.नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला.आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही."[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]

११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा,घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा,स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे.दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]

समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.

[जनता,१०-२-१९५१]

दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-"माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली.पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.

एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-

अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-

[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-

स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:

अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.

श्लोक १२९-यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//

अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?

श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.

श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.

श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.

स्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.

श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.

श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.

श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.नवर्याने भेट म्हणून दिलेले.४.वडिलांनी दिलेली.५.आईने दिलेले.६.भावाने दिलेले.

श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.


आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्म्रुतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.


राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.

या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे.ते म्हणतात:-"बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले."[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती,बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन].

।। राजमुद्रा ।।



प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववन्दिता ।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्‍ववंदनीय होतो,तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्‍वाच्या लोककल्याणासाठी शोभत आहे,राज्य करत आहे.

बाजी पासलकर

बाजी पासलकर


                                                                                                                                                                          
 

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.
त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.

बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

सरसेनापती हंबीरराव मोहिते

सरसेनापती हंबीरराव मोहिते 



आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले.

बहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.

बहादूरखान,दिलेरखानादींना नजरेत धरले नाही

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लुट मारून आणिली.या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो,'राजियांनी आपले लष्करास हुकूम करून हंबीरराव सरनौबत फौज घेऊन मोंघलाईत शिरले. खानदेश, बागलाण, गुजराथ, अमदाबाद,बुर्‍हाणपूर,वर्‍हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला.मालमत्ता अगणित जमा करून चालिले.तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले.राजियाची फौज तोलदार गाठली.मोंघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालिला.दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली.हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही.तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले.मालमत्ता राजियास दिली.

व्यंकोजीराजावर विजय

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला.विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले.याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले.व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.हे युध्द १६ नोव्हेंबर,१६७७ साली झाले.यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला(२२ जुलै, १६७८).

प्रधानांची बंडखोरी मोडिली

छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी राजारामास गादीवर बसविण्याचे ठरवून संभाजीराजेंचा गादीवरील हक्क नाकारला.या मंडळीतील मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो,प्रल्हाद निराजी या मंडळीना वाटले की राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा असल्यामुळे,आपल्या कटात हंबीरराव सामील होतील.पण हंबीररावांनी या तिघांना कैद करून कोल्हापूरास पन्हाळा किल्ल्यावर संभाजीराजें पुढे उभे केले.कारण हंबीररावांना माहित होते की मोघलांच्या प्रचंड अशा सेनेशी संभाजीराजांसारखा छावाच लढू शकतो.
पुढे संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुर्‍हाणपूर शहर लुटिले.मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो,'देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने असा लक्षावधी रूपयांचा माल बुर्‍हाणपूरातील दुकानांत साठविला होता.तो सर्व मराठ्यांनी लुटला.मराठे अगदी अनपेक्षीतपणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते.त्यांना मराठ्यांनी घेरले.विशेषत: बहादूरपुर्‍यावर ते इतक्या अनपेक्षीतपणे तुटून पडले की त्या पुर्‍यांतून एक माणूस किंवा एक पैसा हलविता आला नाही.'

अनेक लढाया

पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले(जुलै १६८२).त्यांनतर मोघल सरदार कुलीच खानाबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोंबर,१६८२),शहाजादा आज्जम बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई(१५ डिसेंबर,१६८२ व जाने-फेब्रु १६८३),मोघल सरदार बहादुरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई(२७ फेब्रुवारी, १६८३),शहाबुद्दीनबरोबर रायगडच्या परिसरात लढाई(जानेवारी,१६८५),मोघली मुलखात चढाया(सन १६८६),अशा अनेक लढाया केल्या.या अशा पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदाराशी झाली(डिसेंबर १६८७).उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जाखानाच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली.पण लढाईच्या कालात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले.अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली.ऐन धामधुमीच्या कालात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला.

"गड आला पण सिंह गेला" नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची साक्ष किल्ले श्री. सिंहगड( कोंढाणा

"गड आला पण सिंह गेला"
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची साक्ष

किल्ले श्री. सिंहगड( कोंढाणा )

पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर,तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

नाव सिंहगड
उंची ४४००मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव सिंहगड
डोंगररांग भुलेश्वर
 


इतिहास

सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार
याचे आधीचे नाव कोंडाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता..


"पुणे दरवाजा"
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
पहा सिंहगडाची लढाई


आजचा सिंहगड
या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मगसूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

गडावरील ठिकाणे

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.
मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

किल्ले श्री. तिकोना (वितंडगड)


किल्ले श्री. तिकोना (वितंडगड)

समुद्रसपाटीपासूनची उंची - ३५८० फूट
पायथ्याचे गाव - तिकोना पेठ
तालुका - वडगाव(मावळ);जिल्हा - पुणे


पुणे जिल्ह्यातील वडगाव तालुक्यातील हा किल्ला तसा छोटेखानी आहे ,तसेच चढण्यास सोपा असून सर्वांनी जाण्यायोग्य आहे. तिकोना किल्ल्याचा डोंगर त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव पडले.मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात असणाऱ्या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपण ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूरच्या किल्ल्याच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी हि लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभरलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधरणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध
आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

इतिहास :

इ.स.१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर,सोनगड,तळा,माहुली व कर्नाळा या किल्ल्यांबरोबरच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला,या किल्ल्याचा उपयोग पवनमावळावर देख्ररेख ठेवण्यासाठी होत असे.इ.स.१६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली,१६६५ च्या पुरंदर च्या तहात तिकोना मुघलांच्या ताब्यात गेला,तो पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामशी कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकून निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्ल्या पाठविल्या.नंतर औरंगजेबाचा मृत्यु झाल्यानंतर तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला.

गडाची सद्यस्थिती व पाहण्यासारखी ठिकाणे

गडाच्या पायथ्यापासून गडावर पोहोचण्यास मळ्लेली वाट आहे,साधारण ४५ मिनीटांची चढाई केल्यानंतर आपण गडाच्या प्रवेश्द्वाराजवळ येतो.इथून आत शिरल्यावर डावीकडे वळावे ,तिथे समोरच लेण्या आहेत्,या लेण्यातच तळजाई देवीचे मंदिर आहे,या लेण्याशेजारीच पाण्याचं कातळ्कोरीव टाके असून समोरच एक तळे आहे. हा सर्व परिसर पाहून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याचा उभा चढ सुरु होतो,बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे ४० पायर्‍यांची चढाई करावी लागते.पायर्‍या उंचीने जास्त असल्यामुळे चांगलीच दमछाक होते.

बालेकिल्ल्याच्या माथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदीर आहे,मंदिराबाहेर उघड्यावरच नंदी आहे,आस्पास बरेच अवशेष आढळतात.बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून तिन्ही बाजूंनी धरणाच्या निळ्याशार पाण्याने वेढलेला 'तुंग'सुळका लक्ष वेधून घेतो , किल्ले तुंगचे हे अत्यंत लोभसवाणे दर्शन डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटते.माथ्यावरून उत्तरेस लोहगड-विसापूर ही दुर्गजोडी दिसते.

गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे, थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेश्द्वारापाशी पोहचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या ह्या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाके आहेत तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडेवर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथून माघारी फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो.
गडाचा विस्तार छोटा असल्यामुळे एका तासात व्यवस्थित फिरून होतो.

गडावर जाण्याच्या वाटा :

बेडसे लेण्या मार्गे : अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणे आणि तिकोना सा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.

ब्राम्हणोली मार्गे : अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे येथून लॉंचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.

तिकोनापेठ मार्गे : गडावर जाणाई मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखीलजीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेत पासून सकाळी ८.३० ला सुटणारी पॉंड बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते. या वाटेने २० मिनिटांतच बालेकिल्ला गाठता येतो.

पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत. गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.

© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
http://www.facebook.com/media/set/?set=a.390697330965966.77682.100000771060136&type=3&l=50e55df722

|| शिवराय मंत्र हा असे शक्तिदाता ||

हिंदू एकता आंदोलन-
http://www.facebook.com/HINDU.EKTA.ANDOLAN

|| जय भवानी | जय शिवराय ||

आज्ञापत्रांतील दुर्गप्रकरण -गडकोटांचे महत्व

आज्ञापत्रांतील दुर्गप्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशानवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखीं महासंस्थानें आक्रमिलीं, संपूर्ण तिस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यांशी अति श्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होतें? परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षां राज्य संरक्षण करणें आहे, त्यापेक्षां अधिकोत्तर साधनी स्वतां गड किल्ल्याची उपेक्षा न करितां परम सावधपणें असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. नूतन देश साधणें. त्या देशांत जीं स्थळें असतील ती महत्प्रयासाने हस्तवश करावीं ज्या देशात गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीनें नूतन स्थळें बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासनें वश करावा. असें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलुखीं टिकाव धरून रहावत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेंच नाहीं. इतक्याचें कारण, गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणाजे अभ्रपटलन्याय आहे. याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्यांचे संरक्षण करणें, व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानूं नये.

गडाची रचना व बांधणी

राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशीं स्थळें पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी आसूं नये. कदाचित असला तरी सुरूंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरूंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा.
गडाची इमारत गरजेची करूं नये. तट, बुरूज, चिलखतें, पाहारे, पडकोट जेथें जेथें असावे ते बरे मजबूत बांधावे, नाजूक जागे जे असतील ते सुरूंगादि प्रयत्नेंकरून, अवघड करून, पक्की इमारत बांधोन गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढें बुरुज देऊन, येतिजाती मार्ग बुरूजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिंता गड पाहून, एक दोन तिन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्यें हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या. इमारतीवरील मामलेदार वगैरे आदिकरून ठेवाणें ते बरे शहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेवावे. गडाची इमारत मुस्तेद करावी. कित्येक किल्ले प्रत्तेक पर्वताचे आहेत. कित्येक पर्वत थोर थोर, त्याचा एखादा कोन, कोप-याची जागा पाहोन बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढें अथवा तटाखालीं मैदानभुमी लागते, म्हणजे तो गड भुईकोटांत दाखल जाहला. आला गनीम त्यानी दरवाजास अथवा तटास लागावें असेम होतें ही गोष्ट बरी नव्हे. याकरितां जातीचा किल्ला असेल त्यास आधीं सर्व प्रयत्ने दरवाज्यापुढें तटाखाली जितकें मैदान असेल तितका खंदक खोल आणी रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधोन त्यावर भांडी, जुंबरे ठेवून, खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे असें करावें. गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून, तावर झादी वाढवून आणखीकडे परके फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे. याविरहित बलकबुलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालूं देऊं नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाज्याचा राबता करुन सांजवादा चढवीत जावा.

गडाची राखण

गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें एक काठीही तोडों न द्यावी. बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावया कारणाजोगे असों द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची घस्ती करीत जावी. घस्तीचा जाब मेटेकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतीचें घर किंवा घराभोंवतें दगडाचें कुसूं सर्वथा असो न द्यावें. तसेंच गडावर आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी तें स्थळ तों आवश्यक बांधणे प्राप्त झालें तरी आधी खडक फोडून तळीं, टांकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशीं मजबूत बांधावीं. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें. गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचें घर बांधो नये. राजमंदिरासही भिंती इटांच्या बांधून त्यास चुना दाट गच्च घालावा. घरांत कोठें उंदिर, विंचू, किडा , मुंगी राहील अशी दरद न ठेवावी. घरास कुसूं पाहीजे तें निरगुंडी आदिकरून झाडांचें पातळ घालावें. गडकरी यांणी राजमंदिर म्हणून खाली न ठेवावें. सर्व काळ करून धुरे करुन घर शाबूत राही, जीव जंतु न राही तें करावें. धनी गडावरी येतात असें कळतांच आगोदर दोन चार दिवस मामलेदारानें येऊन, खासा उभा राहून, संपुर्ण घर सारवून, रांगोळी आदिकरून घालून धनी गडावरी येईतोपर्येत त्याच जागा सदर करून बसत जावें. गडावरील मार्गा मार्गावरील बाजारांत तटोतट केर कसपट किमपी पडो न द्यावें. ताकीद करून झाला केर गडाखाली न टाकतां जागाजागी जाळून ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावें.

गडावरील साहित्य व युद्धाची सामुग्री

गडावरील धान्यगृहें, इस्तादेचीं घरें, ही सकळही (आहेत त्यास) अग्नी, उंदिर, किडा, मुंगी वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी करून गच्ची बांधावी. ज्या किल्ल्यास काळा खडक दरजेविरहीत असेल तसे ठिकाणी ते कड्यास टांकी करावी. स्वल्पमात्र दरज असेल तरी गच्च लावून पाझर न फुटे असें करावें. गच्चंस अरेना अशी भुई असेल तेथें गच्चीघरें करून थोर थोर कांचेचे मर्तबान, झोलमाठ, मडकी आणून त्यांस मजबूत बैसका करून त्यांत तेल तूप सांठवावें. दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. सदरेपासून सुमारांस जागा बांधून भोंवते निरगुंडी आदिकरून झाडांचें दाट कुसूं घालून बांधावें. तयास तळघर करावें. तळघरांत गच्च करावा. त्यांत माच घालून त्यावर दारूचे बस्ते, मडकी ठेवावे. बाण, होके, आदिकरून मध्यघरांत ठेवावे. सर्दी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत. तट सरनोबत, बारगीर, सदर-सरनोबत, हवालदार यांसी बंदुकीचा व भांडी डागायचा अभ्यास असावा. (संपुर्ण हशमांनी तलवार, टाकणी हेही हत्यारें बाळगीत जावी.) गड पाहून, गडाचे नाजूक जागे पाहून, त्या त्या जागी व गडाचे उपराचे जागां त्या त्या सारिखी भांडी, जुंबरे, चरक्या आदिकरून यंत्रे बुरुजाबुरूजांत तटोतट टप्पेगुजरे बांधून ठेवावी. भांडीयांचे गाडे, चरक, भांडी पाहून मजबूत लोखंडी कट देऊन त्यावर ठेवावीं. दारूच्या खलित्या, गज, भांडी निवावयाच्या कुंच्या, गोळे, कीट आदीकरून रेजगिरी सुपरी प्रमाणे लहानथोर नदीतले खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या, तरफा, काने, दुरूस्त करावयाचे सामते, आदिकरून हा जिन्नस भांडियांचा भांड्याजवळ हमेशा तयार असावा. अहिनी दगडी जिन्नस दारूचे अंतरी ठेवावे. होके, बाण हेही पहारेपहा-यास तयार असों द्यावे. दरम्यान, मुलखांत गनीम कोठें आहे, येईल ते समयीं कोठीतून आणून तयार करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूळ, आळशी. तशास मामला सांगों नये. एक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें, तरीच समयीं दगा होत नाहीं, लावून दिला कायदा अव्याहत चालतो. पर्जन्यकाळी भांडीयास व दरवाज्यास तेल मेणे देऊन भांडियांचेही कोने मेणानें भरून भांडियांवर भांडियापुरती आघाडी घालून जायां होऊं न द्यावीं. वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे. इमारतीचे काम आधीं तयार झालेंच असतें. तथापि तट, पहारे, बुरूज, कोट, काहिं जायां होतच आहे ते वरचेवरी मजबूत करावे लागतात. तटास झाड वाढतें तें वरचेवरी कापून काढावें. तटाचें व तटाखालील गवत जाळून गड नाहाणावा लागतो.

गडाचा कारखाना.

या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमी ठेवून मुद्राधारी यांचे स्वाधीन करावा. तसेंच गोलंदाज विश्वासूक कबिलेदार, नेमिला जागा दुरूस्त मारणार, असे मर्दान, गड व गाडाचीं भांडी पाहून जितके लागत असतील तितके ठेवावे. गडावरी झाडें जीं असतील ती राखावीं. याविरहित जीं जीं झाडे आहेत तीं फणस, चिंच, वड, पिंपळ, आदिकरून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे, आदि करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जें झाड होत असेल तें गडांवर लावावें, जतन करावें. समयी तितकेही लांकडाचे तरी प्रयोजनास येतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक, व्युत्पन्न तसेंच रसायण वैद्य व झाडपाल्याचे वैद्य व शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, व लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवावे. लहानसहान गडांवर या लोकांचे नित्य काम पडतें असें नाही, याकरिता त्यांचे कामाची हत्यारें त्यांजवळी तयार असों द्यावीं. जे समयीं काम पडेल ते समयी काम करितील, नाहीं ते समयी आदिकरून तहशील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावे. गडोगडीं तनखा, दास्ताद, इस्तान आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करून ठेवावेंच लागतें. याविरहित गड म्हणाजे आपले कार्याचे नव्हेत, असें बरें समजून आधीं लिहिलेप्रमाणें उस्तवारी गडाची करावी.

(आज्ञापत्रावरून)