शिव काव्य

शिव कवी - कवीराज भूषण यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांवरती रचलेली काव्य.

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली तिकमपूर नावाचे कानपूर जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे झाला. यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना ४ मुले. १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले थोरले बंधू चिंतामणी यांच्या जवळ राहात असत. पण एक दिवस भावजयीच्या काही दुरूत्तरांमुळे रागावून ते घराबाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या विद्वत्तेच्या व कवित्वाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करून घेतला. चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले. शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे. शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.भूषण फारच वृद्ध होऊन वयाच्या १०२ व्या वर्षी वारले. शिवरायांनंतर ते छत्रसाल बुंदेला यांना जावून भेटले होते.

कविराज भूषण कोण होते ? (कवि भूषण यांच्या शब्दात)

देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही |
तिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी ||

द्विज कन्नोज कुल कश्यपी, रत्नाकरसुत धीर |
वसत त्रिविक्रमपुर सदा, तरणी तनुजा तीर ||

वीर बीरबल से जहाँ उपजे, कवी अनुभुप |
देव बिहारिश्वर जहाँ, विश्वेश्वर तद्रूप ||

कुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र |
कवी भूषण पदवी दै, ह्रुदयरामसुत रुद्र ||

अर्थ :
विविध देशातुन त्यांच्याकड़े(शिवराय) गुणीजन येतात
त्यांच्यामधे भूषण म्हणुन एक कवी आला आहे.
कनोजी ब्राह्मण, कुल कश्यप आणि रत्नाकराचा मुलगा
यमुना तीरी असणाय्रा त्रिविक्रमपुरला राहतो.
हा कवी वीर बिरबलाच्या भुमितुन जेथे
बिहारिश्वराचे वास्तव्य आहे तेथून आला आहे.
कुल सुलंक चितकुटपती, साहसशील समुद्र असणाय्रा
राजा ह्रुदयरामाचा मुलगा रुद्र याने भूषण ही पदवी दिलेली आहे.



भुषणाच्या 'शिवभुषण' या ग्रंथात ३८२ छंद आहेत. हा खरा अलंकार शास्त्रवारील ग्रंथ आहे. १०५ अलंकारांच्या व्याख्या दिल्या आहेत आणि त्यांच्या उदाहरणे स्वतःच सांगितली आहेत. या ग्रंथाचे नायक शिवराय आहेत.




No comments:

Post a Comment